बुधवार 15 फेब्रुवारी 2012

मतदार नक्की कोण आहेत?


    मतदार नक्की कोण आहेत? सूज्ञ, मूर्ख,लाचार की बावळट? हा प्रश्न आज अत्यंत प्रकर्षाने पडण्याचं कारण म्हणजे राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणूकीच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेतेमंडळींनी जी एकमेकांविषयी गरळ ओकली आहे ती पाहता ही मंडळी मतदारांना मूर्ख तरी समजत असावीत किंवा बावळट तरी समजत असावीत असे समजण्यास बराच वाव आहे.आपण एकमेकांचे वस्त्रहरण करू म्हणजे मतदार,ज्यांना जाहीर भाषणात ’सूज्ञ’ संबोधले जाते,ते आपल्यावर ,आपल्या तथाकथीत स्पष्टवक्तेपणावर विश्वास ठेवतील आणि आपल्या विरोधकांना नामोहरम करतील आणि आपण सत्तेवर येऊ असे त्यांना वाटत असावे. आणि म्हणूनच आजच्या घडीला मतदारांवर, म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांवर मोठी जबाबदारी आहे,हे लक्षात घ्यायला हवे.
   गेल्या दहा-पंधरा दिवसातील वर्तमानपत्रे जर तुम्ही अगदी ढोबळमानाने जरी वाचली असतील किंवा अगदी जाता-जाता म्हणून जरी दूरचित्रवाणीवरील वाहिन्या पाहिल्या असतील तरी तुमच्या लक्षात आले असेल की,जी मंडळी सणासूदीला किंवा ’आपण दिवाळी कशी साजरी करता’ या सारख्या अत्यंत फुटकळ  प्रश्नावर प्रतिक्रीया देण्यासाठी उपलब्ध असायची ती मंडळी आज घाऊक बाजारात उभे असावे तसे उठ सूठ सर्व वाहिन्यांना मुलाखती देत सुटली आहेत.हे सर्व पाहील्यानंतर तुम्हाला काय वाटते? कशामुळे हे घडले असावे? मतदार खरेच ’राजा’ आहे,म्हणून असे घडले असावे? नाही. यामागे खरे कारण हे आहे की,आण्णा हजारे यांनी या सहा महीन्यात भ्रष्टाचार विरोधी जे वातावरण निर्माण केले आहे त्याने ही नेतेमंडळी धास्तावली आहेत,हे आहे.कदाचित मी हे जे म्हणतो ते अनेकांना पटणार नाही.कारण आणांच्या आंदोलनाला जनजागृतीचे श्रेय देणं अनेकांना जड जातं.कदाचित तसे केल्यास आपण बुरसटलेल्या विचारांचे ठरवले जाऊ अशी भिती त्यांना वाटत असावी.पण तुमच्या माझ्या सारख्या सर्व सामान्य़ मतदाराला  आण्णांना आणि त्यांच्या आंदोलनाला श्रेय न देण्याचे काहीच कारण नाही. थोडक्यात सांगायचे तर भ्रष्टाचाराने बरबटलेले हे नेते मनातून घाबरले आहेत.अशा परिस्थितीत मतदारांनी आपल्यावरील जबाबदारी ओळखायला हवी.त्याचप्रमाणे आपल्या मताचे मोल समजून घ्यायला हवे आणि ते मोल मतपेटीतून व्यक्त व्हायला हवे.
    या निवडणूकीच्या निमित्ताने अजित पवारांनी मुंडें,राणे यांचे घोटाळे बाहेर काढले आणि आमचे तोंड उघडायला लावू नका म्हणून बजावले.राणे यांनीही अशीच धमकी दिली. थोड्याफार फरकाने भुजबळ,राज ठाकरे,उध्दव ठाकरे यांनी हेच केले.कोणी किणी प्रकरणाकडे बोट दाखवले तर कोणी तेलगी प्रकरणाकडे बोट दाखवले. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटत नाही,ही सर्व मंडळी गुन्हेगार आहेत आणि सत्ताप्राप्तीतून मिळणारे आधिकार जनतेच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याऐवजी एकमेकांना ब्लकमेल करून स्वतच्या गुन्ह्यांवर पांघारून घालत आहेत.या सर्व नेत्यांना जर खरोखरच जनतेची,या देशाची काळजी असेल ,या देशाचे भले व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेली गुन्हेगारांची माहीती पोलीसांना द्यायला हवी.किंवा या गुन्हेगारांना न्यायालयात खेचायला हवे.पण तसे घडत नाही.कारण सगळेच चोर.कोणी तिहार मधून सुटलेले,कोणी त्या वाटेवर असलेले तर कोणी पुराव्या अभावी ताठ मानेने समाजसेवक म्हणून वावरणारे.आणि म्हणूनच आता आपणच सावध होऊन आपले मत विचारपूर्वक द्यायला हवे. मला माहीत आहे ,आपल्याला निवड करायची आहे ती-वाईट,खूप वाईट आणि टाकाऊ यांच्यातून .पण जोवर आपल्याला उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळत नाही तोवर तरी याला पर्याय नाही.त्यामुळे आपण आपला हक्क बजावायला हवा.आणि आपण खरोखरच सूज्ञ आहोत हे सिध्द करायला हवे.अन्यथा ’सुज्ञ’ ही शिवी ठरेल.ती तशी ठरवायची का हे ठरविण्याची वेळ आता आली आहे.

गुरुवार 26 जानेवारी 2012

लोकशाही की, लबाडशाही ?



    लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य ही लोकशाहीची  व्याख्या आता  बदलायला हवी.त्याऐवजी "लबाडांनी लबाडांसाठी पळविलेले "जन्तेचे" राज्य म्हणजे लोकशाही",अशी ती करायला हवी.किंबहूना या अशा लोकशाहीला लोकशाही न म्हणता ’लबाडशाही’किंवा’लोभशाही’असे म्हणायला हरकत नाही. निवडणूका आल्या की, या लबाडांना देशाच्या विकासाचे प्रश्न सतावू लागतात."आम जनतेला" दोन वेळेचे अन्नही मिळत नाही,याचा साक्षात्कार यांना होतो आणि मग हे लबाड तथाकथित विकासाची कास धरणाऱ्या पक्षांकडे आपला मोर्चा वळवतात.किंवा आपल्या पक्षातच सवता सुभा निर्माण करतात. ही अशी आम जनतेच्या नांवाने टाहो फोडणारी ’विकासरत्ने’ पाहीली की,मन कसे गदगदायला होते.आणि मग आपणही एकदा हा "आम आदमी"पाहायलाच हवा असं वाटू लागतं.खरचं कसा असेल हा आम आदमी?
    पंचवीस एक वर्षापूर्वी म्हणे हा आम आदमी झोपडपट्ट्यांमध्ये राहत असे.निवडणूकीच्या काळात या आम आदमीच्या तोंडावर  शे-पाचशे रुपये फेकले की, तो निमूटपणे आपल्या अन्नदात्याला मत देत असे.पण हळूहळू त्याच्यातही बदल होत गेले.पैसे फेकणाऱ्यांची संख्या वाढल्याने तो निमकहरामी करू लागला.आणि जो जास्त पैसे देई, त्याला आपले बहूमोल मत विकू लागला.साहजिकच आहे, विकासरत्नांनी ’आकडेरूपी’ ज्ञानाची गंगा त्याच्या झोपडीपर्यंत आणली असल्याने त्याला त्याच्या मताचे मोल समजू लागले.त्यामुळे विकासरत्नेही जागे झाली.  पैसे वाटतानाच मतदाराच्या हातावर मीठ ठेऊन आणि खंडोबा किंवा कुलस्वामिनीला साक्षी ठेऊन आणा-भाका देऊ लागले.पण हळूहळू भावनेचे हे ब्लॅक मेलींगही कुचकामी ठरू लागले. आम आदमीची भूक वाढली.महागाईच्या प्रमाणात तीचे वाढणेही स्वाभाविक होते.
    दरम्यान, लबाडांनी फ्लॅटवाल्यांकडे आपला मोर्चा वळविला. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या सोसायट्यात कोठे फरशा टाकून दे,कोठे ज्येष्ठ नागरिकांना बसायला बाकडी टाकून दे असे मार्ग हाताळू लागले.पण थोड्याच दिवसात या लबाडांमध्येही स्पर्धा सुरू झाली.मग त्यापैकी काहींनी तीर्थयात्रांचे आयोजन सुरू केले.कोणी साईबाबाला जवळ केले तर,कोणी थेट बालाजीची वारी काढू लागला.आणि आता तर घरोघरी पुस्तकगंगा अवतरू लागली आहे.ज्यांनी शाळेत कधी पुस्तकाला हात लावला नसेल ती मंडळी आता तथाकथित सुशिक्षित मतदारांना घरपोच पुस्तके देऊ लागली आहेत.थोडक्यात आता पांढरी कॉलरवाल्यांनी आपल्या सोसायट्याही झोपडपट्ट्याहून वेगळ्या नसल्याचे दाखवत हम सब भाई-भाई चा धडा गिरवण्यास सुरूवात केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर हे लबाड लोक जेंव्हा अण्णा हजारे यांच्या सारख्यांना निवडणूकीला उभे राहण्याचे आव्हान देतात,तेंव्हा त्यांची कीव करावी की,त्यांच्यापुढे लोटांगण घालावे ते समजत नाही.गल्लीबोळात टगेगिरी करणारे जेंव्हा संसदेच्या प्रतिष्ठेच्या गप्पा मारतात,तेंव्हा हसावे की रडावे ते समजत नाही.आणि  सर्व सामान्य लोक जेंव्हा अशा प्रचाराला बळी पडून आपल्या मताचा बाजार मांडतात तेंव्हा ’जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेला देश’ही बिरूदावली मिरवण्यास आपण पात्र आहोत का,याचा विचार कोणासही का करावा वाटत नाही?,हे मनात येऊन गरगरायला होते.आणि शेवटी एवढेच म्हणावे वाटते की,यथा प्रजा तथा राजा,हेच  अंतिम सत्य होय!

शनिवार 31 डिसेंबर 2011

तूर्त तरी, भ्रष्टाचाराचा विजय असो!




     अण्णांनी तीन दिवसांऐवजी दोन दिवसातच उपोषण गुंडाळलेले पाहून अनेक स्वंयघोषीत काँग्रेस प्रवक्त्यांनी त्यांची खिल्लि उडवली.युवावस्थेत असताना केलेल्या एखाद-दुसऱ्या आंदोलनाच्या जोरावर स्वत:ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या तथाकथित नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांच्या भाटांना त्यामुळे परमानंद झाल्याचे चित्र काही काळ पहायला मिळाले.महात्मा गांधी उघडे राहत आणि तरिही आंदोलन करित,त्यांनी कधी तब्बेतीचे कारण पुढे केले नाही,असे सांगत काहींनी  अण्णांच्या उपोषण लवकर थांबविण्याची हेटाळणी केली.परंतू ही हेटाळणी करताना ते हे विसरले की,गांधीजींचे उपोषण हे जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगणाऱ्या इंग्रजांविरूध्द असायचे.आणि मला खात्री आहे की,गांधीजींना हल्लीच्या काँग्रेसजनांपुढे किंवा कोणत्याही पक्षाच्या सत्ताधिशांपुढे  उपोषण करावे लागले असते, तर त्यांनी कदाचित ते तासाभरातच सोडले असते.खरे तर अण्णांनी उपोषण सोडताना हे स्पष्ट केले होते की,लोकसभेत जे काही घडत आहे ते पाहून आपण हे उपोषण मागे घेत आहोत.लालूप्रसाद यांच्या सारखा खासदार जेंव्हा लोकपाल सारख्या महत्वाच्या विषयावर गांभिर्याने बोलण्याऐवजी नौटंकी करतो आणि त्या नौटंकीला पंतप्रधान आणि सोनिया गांधी हसून दाद देतात तेंव्हाच अण्णांना लोकपाल विधेयकाचे काय होणार याची कल्पना आली असणार आणि म्हणूनच त्यांनी उपोषण थांबविण्याचा निर्णय घेतला असणार.कारण दान जसं सत्पात्री असावं तसंच उपोषण ही शहाण्यांपुढे करावं असं, जर त्यांना वाटलं असेल तर  त्यामध्ये काही गैर आहे असे वाटत नाही.आणि अण्णांचा तो निर्णय किती योग्य होता ते राज्यसभेत जे काही घडलं त्याने सिध्द केलं.लालूंच्या पक्षाच्या राजनीती नांवाच्या (काय योगायोग आहे पहा!) खासदाराने विधेयकाचे तुकडे तुकडे केले आणि आपल्या गलीच्छ राजनीतीचे दर्शन घडविले.हेतूपुरस्सर निर्माण केलेल्या या गोंधळाचा फायदा घेत सभापतींनी अधिवेशन गुंडाळले.लोकसभेतील लालूंची नौटंकी आणि त्यांच्याच पक्षाच्या खासदाराची राज्यसभेतील मुजोरी या सर्व प्रकरणामागे काँग्रेस असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण लोकपालबाबत काँग्रेस गंभिर आहे असे कधीच दिसले नाही.अशा परिस्थितीत अण्णांनी वेळेवर उपोषण सोडले असेच म्हणावे लागेल.
    वाईट याचेच वाटते की,अण्णांनी लवकर उपोषण सोडल्याचा काही जणांना जो आसूरी आनंद झाला ,तो अतिशय ओंगळवाना होता.कारण,अण्णांनी  वेळेपूर्वी उपोषण सोडणे यामध्ये त्यांना कमीपणा यावा असे काही न्हवते,किंवा त्यांना त्याची लाज वाटावी असे काही नाही.लाज वाटून घ्यायचीच असेल तर त्यांची हेटाळणी करणाऱ्या आणि त्यांची फजिती झाली समजून आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना वाटायला हवी.कारण अण्णांचे आंदोलन स्वत:साठी नाही, तर ते  सर्वसामान्यांसाठी आहे.हे लक्षात घ्यायला हवे.उद्या सशक्त लोकपाल आले आणि त्याची तेवढ्याच प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर ते जनहीताचेच असणार आहे,यात शंका नाही.तेंव्हा अण्णा,आपण उपोषण लवकर सोडले ते बरेच केले!
  उपोषणाला मिळालेला अल्प प्रतिसाद हाही अनेकांना आनंद देऊन गेला.परंतू या अल्प प्रतिसादामागची कारणे शोधली तर त्यामागे काँग्रेसजनांनी मधल्या काळात अण्णाच्य़ा सहकाऱ्यांच्या बदनामीची जी यशस्वी मोहीम राबवली त्याला तसेच न्यायालयाने अण्णांच्या समर्थकांना एमेम आरडीएच्या भाडेप्रकरणी जे खडसावले ते खडसावनेही कारणीभूत ठरले असावे.संसदेमध्ये चर्चा सुरू असताना उपोषणाची गरजच काय?असा न्यायालयाचा प्रश्न होता.आणि तो प्रश्न लोकांना कदाचित पटला असावा.परंतू संसदेमध्ये नंतर जे काही घडले त्याने लोकांचे डोळे नक्किच उघडले असतील आणि त्याचा परिणाम  पुढील आंदोलनावेळी दिसेल,अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.खरे तर लोकपाल मंजूर करून अण्णांना नमविण्याची एक चांगली संधी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना होती,पण ती त्यांनी त्यांच्या उपजत गुणांनी गमावली.कारण भ्रष्टाचार हाच जवळपास सर्वच नेत्यांच्या राजकारणाचा पाया आहे.आणि त्याला तडा जाणे हे या मंडळींना रूचणारे नाही.फक्त त्याचे खापर आपल्या माथी येऊ नये यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालू असतात.त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांनाच जागे होऊन आंदोलन करावे लागणार आहे.आणि ते शक्य नसल्यास किमान अण्णांना भरघोस पाठींबा तरी द्यायला हवा.अगदी टीम अण्णामधील काही दोषांकडे डोळेझाक करून.कारण टीम अण्णा जे काही तथाकथित गैरव्यवहार करेल ते या राजकारण्यांच्या तुलनेत एक लक्षांश असतील.त्यामुळे आता जसा भ्रष्टाचाराचा विजय झाला तसा पुन्हा होऊ नये यासाठी आपण जागरूक असायला हवे.याचा अर्थ टीम अण्णांनी मनमानी करावी असा होत नाही.उलट या मंडळींनी लोकांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन आपले वर्तन राखायला हवे  आणि सत्ताधाऱ्यांना आपल्याकडे बोट दाखविण्याची एकही संधी मिळणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.अन्यथा लोकांमध्ये नैराश्य निर्माण होऊन त्यांच्यामध्ये "ठेविले अनंते"अशी नकारात्मक भावना निर्माण होईल.आणि जर अशा नकारात्मक भावनेचा स्फोट अराजकात झाला तर मग या देशाला वाचविणे परमेश्वरालाही शक्य होणार  नाही.

गुरुवार 22 डिसेंबर 2011

"ग्रेस" आणि आम्ही



    कवी ’ग्रेस ’यांना सन २०११ साठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि आमच्यातील, थोडाफार कवी असलेला, माणूस सुखावला.परंतू त्याचवेळी ग्रेस यांनी पुरस्कार उशीरा मिळाल्याबद्दल व्यक्त केलेली खंत आणि पारितोषिकाची रक्कम आपण कोणाही व्यक्ती अथवा संस्थेला देणार नसल्याचा,हा कोणीही न विचारताच व्यक्त केलेला निर्धार वाचून आम्हाला दि.२४ मार्च १९९८ रोजी लिहलेला (आणि "छूमंतर"या पुस्तकात समाविष्ट असलेला) आमचाच एक लेख आठवला आणि आम्हाला आमच्याच दूरदृष्टीची कमाल वाटली.तो लेख असा आहे-
 पारितोषिक प्रदेश
   आता माणिक गोडघाटेंच्या (पक्षी:ग्रेस) प्राक्तनात पारितोषिक प्राप्तीचा योग नाही,त्याला ’मिशावाले’नेमाडे किंवा ’बिनमिशावाले’डहाके काय करणार?(आता डहाके यांना मिशा आहेत की नाहीत हे आम्हाला माहीत नाही.परंतू ज्या अर्थी गोडघाटेंनी फक्त नेमाडे यांच्याच मिशांचा उल्लेख केला आहे,त्याअर्थी डहाकेंना मिशा नसाव्यात.असो.)आपल्याला पारितोषिक न मिळण्यामागे ’नेमाडे आणि टोळीचा’ हात असल्याचे म्हटले आहे.यापूर्वी आमचा असा समज होता की टोळ्या फक्त गुंडांच्या आणि त्यानुषंगाने पुढा-यांच्या असतात; परंतू गोडघाटेंनी साहित्यिकांच्याही टोळ्यांवर एवढ्या  ’ग्रेस’फुली प्रकाश टाकला आहे की,प्रत्येक साहित्यिकाने (आपापल्या घरच्या)आरशात स्वत:चा ’फेस’ काळजीपूर्वक तपासला असेल आणि आपण छोट्या शकील सारखे दिसतो की,दाऊदभाईसारखे दिसतो,हे पाहून ठेवले असेल.म्हणजे पुढे युध्दाचा प्रसंग उदभवलाच, तर तुमचा तो (म्हणजे पारितोषिक मिळालेल्यांचा)दाऊद तर आमचा(म्हणजे पारितोषिक न मिळालेल्यांचा)गवळी असा पवित्रा घेणे सोपे जाईल.ते असो.सांगायचा मुद्दा काय तर साहित्यिकांच्याही टोळ्या असतात आणि त्या पारितोषिकांच्या कुंपणावर पुस्तकं रोखून बसलेल्या असतात.अशा या टोळ्यांना उध्वस्त करण्याचं काम गोडघाटेंनी रसिकांवर सोपवलं आहे.(रसिकांनी काय काय करायचे? गोडघाटेंच्या कवितांचा अर्थ लावत बसायचे की,प्रयत्न करूनही अर्थ न लागणे व त्यामधून निर्माण होणारी चिडचीड गोडघाट्यांच्या हितशत्रूवर काढायची?) ते काही असो,आमच्या डोळ्यांपुढे सध्या तरी टोळीयुध्दाचे प्रसंग चमकू लागले आहेत.एकीकडे पारितोषिक प्राप्त आणि दुसरीकडे पारितोषिकापासून वंचित(आणि त्यामुळे चिंतित झालेली) मंडळी समोरासमोर(परंतू एकमेकांच्या आड लपून)उभी ठाकली आहेत.सारा आसमंत (ध्वनी) प्रदूषण भरून गेला आहे आणि त्यांना पांगविण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा मोर्चा पुढे पुढे येत आहे.त्या कोलाहलात गोडघाटेंच्या कविता (दुर्बोध नका हो म्हणू!)आक्रंदून उठल्या आहेत.गोडघाटे गरजताहेत-
पारितोषिक सरकारी;
निमसरकारी.
गल्लीतले;दिल्लीतले
पारितोषिक.
पारितोषिक
रस्तोरस्ती; गल्लीबोळात
पारितोषिक झगमगाटात;
व्यासपिठावर.
पारितोषिकं
खुपताहेत.
(पुढे ऐका-)
ती (पारितोषिकाची वेळ) गेली तेंव्हा
छनछन पैसा खुळावत होता
पारितोषिकात गुंतल्या रकमा
हा ग्रेस मोजीत होता.

सोमवार 7 नोव्हेंबर 2011

देऊळ : श्रध्देसाठी की अंधश्रध्देसाठी ?

     
    नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांनी दूरचित्रवाणीवर केलेली अफाट स्तुती,प्रदर्शनापूर्विच त्यातील गाण्याविषयी उठलेले वादळ, चित्रपटाचे प्रोमोज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वळूच्या दिग्दर्शकाचा सिनेमा यामुळे देऊळ बद्दल ब-याच अपेक्षा होत्या.परंतू दुर्दैवाने या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.म्हणजे चित्रपट वाईट आहे असे नाही.एकदा पाह्यला अजिबात हरकत नाही.मात्र वळू पाहताना जे समाधान मिळाले होते, ते मिळाले नाही एवढे खरे.त्याचे कारण या चित्रपटातील अनेक बाबींचा उलगडाच होत नाही.किमान मला तरी झाला नाही.
    या चित्रपटातील खटकणारी पहीली गोष्ट म्हणजे त्यातील पात्रे. ही पात्रे  फिल्मी वाटतात.वळूतील पात्रांमध्ये जो अस्सल गावरान बाज होता तो येथे नाही.केवळ लग्न ठरले म्हणून कोणतीही मुलगी आपल्या भावी नव-याच्या अंथरूनात (शब्दश:) घुसून त्याच्याशेजारी झोपणार नाही.येथे मात्र नायकाची भावी बायको खुशाल अपरात्री आपल्या भावी नव-याच्या अंथरूनात शिरते आणि तेही अंगणात.( भले पुढे या भावी नव-याला ताप आल्याचे तीला अशा घुसखोरीमुळे कळत असो.)चित्रपटातील व्यक्तिरेखा जर एखाद्या समाजजीवनाचे प्रतिनिधित्व करत असतील तर हे व्यक्तिचित्रण अगदीच हिणकस आणि अनावश्यक असे आहे.
    हा चित्रपट अंधश्रध्द्दावर,देवाच्या केल्या जाणा-या अवडंबावर आणि देवाला बाजारात विक्रियोग्य वस्तू ठरविणा-यावर प्रहार करण्यासाठी निर्माण करण्यात आला असेल तर तो दावाही एका प्रसंगाने मातीत मिळवला आहे.तो प्रसंग असा आहे: देवाची गाय पायाला जखम होऊन मरते.त्यावेळी या गायीला चरायला नेणारा चित्रपटाचा नायक (म्हणजेच वर उल्लेख केलेला नवरा)तेथे उपस्थित नसतो.तो त्या गायीला शेवटचे पाणीही पाजू शकत नाही.त्यानंतर काही दिवसातच या नायकाची गाठ एका दरोडेखोराशी पडते.विशेष म्हणजे या दरोडेखोराच्याही पायाला बंदूकीची गोळी लागलेली असते आणि तो तहाणलेला असतो.चित्रपटाचा नायक आपल्याकडील पाण्याने या दरोडेखोराची तहाण भागवतो.आणि तेथून निघून जातो.जाताना मागे वळून पाहतो तर तेथे कोणीच नसते.याचाच अर्थ देवाची गाय त्याला दरोडेखोराच्या रूपात दर्शन देते.ही अंधश्रध्दा नाही तर काय आहे?(मला या प्रसंगाचा लागलेला अर्थ तरी असा आहे.) सर्वात वाईट बाब म्हणजे नसिरूद्दीन शहा सारखा अत्यंत ताकदीचा कलाकार दरोडेखोराच्या चार-पाच मिनिटाच्या भूमिकेत वाया घालवला आहे.
 चित्रपटातील खटकणारी तिसरी गोष्ट म्हणजे नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा जो प्रणय म्हणा किंवा काही म्हणा,दाखवला आहे  तो अतिशय फिल्मी आणि वैताग आणणारा आहे.गावातील प्रमुख पुढारी,जो आमदारकीचे स्वप्न पाहतोय तो आपल्या बायकोबरोबर घरात सागरगोटे खेळत असतो.आणि खेळताना नेमकी एक सागरगोटी नको तेथे जाऊन अडकते.(पुढचे तुम्ही ओळखा).  असे या जोडीचे  आणखी काही प्रसंग आहेत.आणि या सर्व प्रसंगामध्ये सोनाली कुलकर्णीचा अभिनय हां ती नानाची घरंदाज बायको न वाटता त्याने तमाशातील बाईशी तर लग्न केले नाहीना, असे वाटायला लावणारा आहे.विशेषत: या जोडप्याच्या दोन्ही मुली शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतात हे समजल्यानंतर तर हा अभिनय पाहून धक्काच बसतो.(अर्थात मुले इंग्रजी माध्यमात शिकतात म्हणून पालक असा चहाटळपणा करणार नाहीत असे नाही.पण चित्रपटात ही बाब नक्कीच खटकली.मात्र हा दोष कुलकर्णीबाईंचा की दिग्दर्शकाचा हे कळण्यास मार्ग नाही.)
     असे असूनही  या चित्रपटाने नक्किच, देवाचे जे  बाजारीकरण झाले आहे  त्यावर ठळक प्रकाश पाडला आहे.चित्रपटगीतांच्या चालीवर देवाची गाणी करणे,सर्वसामान्यांना घबरविणारे एस.एम.एस.पाठवून देवस्थान जागृत  असल्याची आवई पिटने इ.बाबी खरोखरीच विचार करण्यास भाग पाडणा-या आहेत.
 महीला सरपंच झालेली आतिषा नाईक,नाना पाटेकर,दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय खुपच सुरेख आहे.पण त्यामुळे चित्रपट उत्तम ठरत नाही,हे नक्की.

मंगळवार 1 नोव्हेंबर 2011

सिन्धुताईना मानपत्र


एल.टी.मारणे फाऊडेशनच्या वतीने देण्यात येणारा समर्पण पुरस्कार सन २०११ साठी अनाथांच्या माता सौ.सिंधुताई सपकाळ याना ३० अक्टूबर रोजी पुणे येथे देण्यात आला. यावेळी सिंधुताईना देण्यात आलेले मानपत्र लिहण्याची संधी मला मिळाली.ते मानापत्र  येथे देत आहे.